बातम्या

जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार झाल्याशिवाय पेरणी करु नका -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन

Appeal of District Magistrate Rahul Rekhawar


By nisha patil - 6/20/2023 5:28:34 PM
Share This News:



कोल्हापूर, प्रतिनिधी  किमान सलग तीन दिवस अथवा 65 मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस होवून जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा तयार झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
चालू हंगामात माहे जून चा पहिला पंधरावडा संपला तरी अद्यापही नैऋत्य मौसमी पावसाला जिल्ह्यात सुरुवात झालेली नाही. जिल्ह्याचे एकूण सरासरी पर्जन्यमान  1971.10 मिलीमिटर इतके आहे. माहे एप्रिल व मे मध्ये वळीव पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी जमिनीच्या मशागती पूर्ण झालेल्या नाहीत. माहे जून 2023 चे सरासरी पर्जन्यमान 367.90 मिलीमिटर इतके आहे. दिनांक 19 जून 2023 अखेर फक्त 18.30 मिलीमिटर ( 5 टक्के) पावसाची नोंद झाली आहे.  पर्जन्यमान अत्यल्प झाल्याने जमिनीमध्ये पुरेशी ओल तयार झालेली नाही. आवश्यक प्रमाणात पाऊस न झाल्यास याचा परिमाण पेरणी होवून उगवण झालेल्या पिकांना धोकादायक ठरु शकतो. जिरायती क्षेत्रावरील सोयाबीन, भुईमुग या पिकांच्या पेरण्या विलंबाने होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर  तसेच भाजीपाला पिके, चारा पिके यांच्या उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होण्याची शक्यता आहे. 
कोल्हापूर जिल्ह्याचे सन 2023-24 या वर्षाकरिता खरीप हंगामातील पेरणीचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 92 हजार 633 हेक्टर आहे. त्यामध्ये भात, नाचणी, भुईमुग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसेच सन 2022-23 मध्ये लागवड व  सन 2023-24 मध्ये  गाळप हंगामासाठी 1 लाख 88 हजार 90 हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगाम सन 2023-24 ला सुरुवात झाली आहे. पश्चिमेकडील काही तालुक्यांमध्ये भाताची धुळपवाफ पेरणी केली जाते.  शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व भुईमुग या पिकाची पेरणी केली जाते. दिनांक 14 जून 2023 पर्यंत एकुण 12 हजार 519 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या फक्त 7 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे नजरअंदाजावरुन दिसून येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय  दिवेकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार झाल्याशिवाय पेरणी करु नका -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन