बातम्या

आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा - राज ठाकरे

Ask the Chief Minister once when he will get reservation


By nisha patil - 1/27/2024 7:25:05 PM
Share This News:



मुंबई : मनोज जरांगे  यांच्या मागणीनुसार सरकारने अध्यादेश काढून तो मराठा समाजाच्या  हाती सुपूर्द केलाय. यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. तसेच राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया यावर उमटल्या. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. यावेळी राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांचं अभिनंदन केलच पण त्यांना एक सल्लाही दिला असल्याचं म्हटलं जातंय. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 
  
राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला. दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. पण तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर थेट वार केला. 

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे यांनी म्हटलं की, 'मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल  ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !'


आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा - राज ठाकरे