बातम्या

अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तेवढीच महत्वाचीच -डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे प्रतिपादन

Every branch of engineering is equally important


By nisha patil - 6/13/2023 7:25:38 PM
Share This News:



कोल्हापूर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभियांत्रिकीचा गरज आहे. अभियंता इतरांपेक्षा वेगळा विचार करतो व त्यातूनच नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होते. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे 'प्रॉब्लेम सॉल्व्हर्स' असून त्यातून समाजोपयोगी सुविधा निर्माण होतात. त्यामुळेच अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक  संधी असून अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तितकीच महत्वाची असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. 
     डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (स्वायत्त संस्था) आयोजित 'अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४' या विषयावर हॉटेल सयाजी येथे आयोजित मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ञ कुणाल वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील, डॉ. आर के मुदगल, कुणाल वाय पाटील, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त प्रियांका अशोक विशे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने सेमिनारचा शुभारंभ झाला. या सेमिनारला 1200 हुन अधिक विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

   यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, गेल्या 4 वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्लेसमेंट मिळत असल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. कॉम्प्युटर शाखा म्हणजे हमखास नोकरी असा विद्यार्थ्याचा समज झाला असून हीच शाखा मिळावी असा अनेकांचा हट्ट असतो. मात्र, अभियांत्रिकीच्या अन्य शाखामध्येही तेवढ्याच संधी आहेत. सर्वात जुनी शाखा असलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सरकारी नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. वाढता वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्राच्या विस्तारामुळे  मॅकेनिकल शाखेचे महत्व कधीच कमी होणार नाही. रसायन उद्योगासह अन्यत्र केमिकल इंजिनिअरला मोठ्या संधी आहेत. मोबाईल व अन्य गॅझेटचे मार्केट वेगाने वाढत असून इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशमध्ये अभियंत्यांना मोठी मागणी आहे. कॉम्प्युटरच्या विविध शाखांमध्येही अगणित संधी आहेत. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी सरकारकडून विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्यामुळे हे शिक्षण महागडे नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे आपली आवड, बाजाराची गरज व भविष्यातील संधी ओळखून योग्य शाखा निवडावी, असे आवाहन डॉ गुप्ता यांनी केले.

सीईटीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून 15 जूनपासून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागतील, सीट अलोटमेंट याबाबत डॉ. गुप्ता आणि पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार लीतेश मालदे, हेड अडमिशन प्रा. रवींद्र बेन्नी  यांच्यासह डी. वाय.  पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे  प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे व प्रा. निलांबरी किलबिले यांनी केले.


सौ शांतदेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध शिष्यवृत्ती मिळतातच. त्याचबरोबर डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांनी गतवर्षीपासून ग्रुपमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘सौ. शांतदेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ सुरू केली आहे. ग्रुपमधील सर्व महाविद्यालयातील प्रत्येक शाखेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एका वर्षाची संपूर्ण फी माफ केली जाते. यावर्षी ही रक्कम सुमारे सव्वा कोटी इतकी असेल अशी माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली.

  

माहिती पुस्तक वाचूनच अर्ज भरा- डॉ कुणाल पाटील
राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ कुणाल वाय. पाटील यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. माहिती पुस्तिका सविस्तर वाचावी व त्यानंतरच अर्ज लक्षपूर्वक भरावा, असे त्यांनी सांगितले. रजिस्ट्रेशन नंतर  ऑप्शन  भरण्यासाठी मिळणाऱ्या कालावधीत आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन फिजिकल मोडने होणार असल्याने अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व कागदपत्र झेरॉक्स नजीकच्या सुविधा केंद्रात तपासून घ्या, असे आवाहन डॉ. कुणाल पाटील यांनी केली. कोणत्या चुका टाळाव्यात यावरही त्यांनी माहिती दिली.


अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तेवढीच महत्वाचीच -डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे प्रतिपादन