बातम्या

"श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते"

Golden Ceremony of Shree Varana Womens Cooperative Various


By nisha patil - 3/9/2024 1:49:14 PM
Share This News:



देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले...

दारिद्रय निर्मूलन,अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन यामध्ये सहकार संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. काळानुरूप सहकार संस्थांनीही स्वतः ला बदलण्याची गरज असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनाला व्यावसायिक बनवले पाहिजे.वारणा समुहाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी आनंद होत असल्याचे सांगून वारणा उद्योगाच्या सर्वांगीण विकासात योगदान दिल्याबद्दल उपस्थित महिलांचे  राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी कौतुक केले...

देशात साडेआठ लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. परंतु अनेक सहकारी संस्था भांडवल, संसाधनांचा अभाव, व्यवस्थापन अशा समस्यांना सामोरे जात आहेत. तरुणांना सहकारात सहभागी करून प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास तरुण त्या संस्थांना नवसंजीवनी देऊ शकतात. सहकारी संस्थांनीही सेंद्रिय शेती, साठवण क्षमता निर्माण करुन, इको-टुरिझम यांसारख्या नवीन क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी केले...

सहकारामुळे देशात येत्या काळात अजून समृद्धी येईल. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी २०२१ मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही सहकार क्षेत्राच्या सुव्यवस्थित आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सहकार धोरण आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी प्राथमिक ते उच्चस्तरीय सहकारी संस्थांपर्यंत अनेक प्रयत्न केले जात आहेत. सहकारी संस्थांना विविध योजनांतर्गत आर्थिक, तांत्रिक व प्रशिक्षण संबंधित सहाय्य दिले जात आहे. सर्व संस्थांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनी या कार्यक्रमात केले...

विकासामध्ये जो पर्यंत महिलांची भागीदारी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही. सहकारातून क्रांती घडू शकते. याचे खरं मॉडेल वारणानगरमध्ये येवून लोकांनी पहावं म्हणूनच येथील झालेल्या कामाबद्दल सहकार महर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली...

वारणा समुहामध्ये साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण मंडळ, वीज निर्माण संस्था,वारणा सहकारी बँक, शेती प्रशिक्षण संस्था, महिलांची पतसंस्था, व्यायाम मंडळ, भगिनी मंडळ, सहकारी ग्राहक चळवळ, महिला औद्योगिक सहकार चळवळ, वारणा बझार इ. विविध क्षेत्रामध्ये झालेली क्रांती थक्क करणारी आहे. ३ हजार कोटींच्या घरात उलाढाल आज वारणा समुहात होत असल्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विकसित भारत होण्यासाठी महिला जोपर्यंत अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाहीत तो पर्यंत विकसित भारत देशाचंही स्वप्न पूर्ण करता येणार नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासन पाठिंबा देत असून लखपती योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण, मोफत एसटी प्रवास या योजनेतून त्या अधिक सक्षम होत आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

भारताच्या राष्ट्रपती सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात आल्याने त्यांचे वारणा समुहाचे प्रमुख तथा आमदार डॉ.विनय कोरे यांनी आभार मानले. तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाचे वारणा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याबद्दल आभार मानले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये वारणा समुहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली...

तसेच वारणा समुहातील कार्यरत महिलांनी राष्ट्रपतींना शिवराज्याभिषेक तेलचित्र भेट म्हणून दिले. तर सावित्री महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांनी राष्ट्रपती महोदयांचे कोल्हापुरी अलंकार व साडी देवून स्वागत केले.राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले...

यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने,वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे आदी मान्यवर उपस्थित होते...


"श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समुहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते"