बातम्या

भुदरगड तालुक्यात तब्बल 25 गव्यांच्या कळपाचे दर्शन

Sighting of herd of as many as 25 cows in Bhudargarh taluka


By nisha patil - 6/19/2023 4:59:06 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी जिल्ह्यात दुर्गम तालुक्यांमध्ये गव्यांचा उच्छाद सुरुच आहे. आजरा तालुक्यात ऊसाच्या शेतात भांगलणीसाठी केलेल्या महिलेवर गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाली. पेरणोलीत झालेल्या घटनेत शालन विष्णून दारूडकर या जखमी झाल्या. गव्याने त्यांना पाठीमागून धडक दिल्याने त्या जमिनीवर कोसळून जखमी झाल्या.  त्यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शालन या शेतात ऊस भांगलण करण्यासाठी गेल्या होत्या. हिरण्यकेशी नदी पार करून गव्यांचा कळप ऊसात शिरला. गव्यांचा कळपाचा मोठा आवाज आल्याने भांगलणीसाठी आलेल्या महिलांनी शेतातून पळ काढला. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या गव्याने पाठीमागून धडक दिल्याने शालन जमिनीवर कोसळल्या. गव्यांचा कळप निघून गेल्यानंतर शेतातील महिलांनी माहिती देताच ग्रामस्थांनी शेतात धाव घेत त्यांना उपचारासाठी दाखल केले.  
यापूर्वी, आजरा तालुक्यात महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली होती. गव्याने अचानक समोरून येत दिलेल्या धडकेने उज्वला जानबा यादव  या जखमी झाल्या होत्या. उज्वला यादव शेतामध्ये ऊस भांगलण करत गव्याने समोरून येत हल्ला केला. अन्य एका घटनेत पन्हाळा तालुक्यात कसबा ठाणे येथील माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. गव्याच्या हल्ल्यात थेट छातीत शिंग घूसल्याने ते जागीच ठार झाले. तत्पूर्वी, 25 मार्च रोजी शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीपैकी केदारलिंगवाडीमधील गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. बंडू बाबू फिरंगे  असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  
ही घटना ताजी असतानाच भुदरगड तालुक्यात तब्बल 25 गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.  तालुक्यातील देवकेवाडी ते भुतोबा मंदिर दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्यांचा कळप दिसून आल्याने शेतकऱ्यांसह रस्त्यावरून प्रवाशांची बोबडी वळाली. हा गव्यांचा पूर्ण वाढ झाल्याच्या स्थितीत आहेत. 
दुर्गम तालुक्यात गव्यांचा धुडगूस 
जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड आणि गगनबावडा या दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये गव्यांचा थेट वावर  वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे. गवे थेट मानवी वस्तीत प्रवेश करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रखर उन्हाळ्यामुळे गव्यांचा अधिवास असलेल्या परिसरात पाणी नसल्याने तसेच चाऱ्याच्या शोधात गवे मानवी वस्तीच्या दिशेने येऊ लागले आहेत. गव्यांकडून उभ्या पिकांना लक्ष्य करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.


भुदरगड तालुक्यात तब्बल 25 गव्यांच्या कळपाचे दर्शन