बातम्या

उन्हाळा आणि आयुर्वेद

Summer and Ayurveda


By nisha patil - 3/6/2023 7:37:35 AM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम:आयुर्वेद शास्त्र हे निसर्गनियमांना अनुसरून राहणीमान कसे ठेवावे, हे अत्यंत प्रभावीपणे सांगते. पृथ्वीवरील निसर्गाचे चक्र कसे चालते, त्याचे मानवी शरीरावर काय परिणाम घडतात व त्यानुसार आहार-विहार कसा असावा, यासाठी साचेबद्ध असे नियम आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत.

पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल सध्या वाढणाऱ्या दुपारच्या उष्म्याने येऊ लागली असेलच! त्याची झळ सौम्य व्हावी यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्‍यक आहे.

या काळात चुकूनही गार पाणी, पंख्याची हवा, एसी यांचा वापर करू नका. गारठ्याने संकुचित झालेली रोमरंध्र नैसर्गिकरित्या मोकळी होऊ द्या आणि मग येणाऱ्या उन्हाळ्याची ऋतुचर्या पाळा. हा नियम नक्की लक्षात ठेवा, थंडीत जशी कडकडीत भूक लागायची, तशी आता लागणार नाही. याच जठरातील अग्नीचा विचार करून आपली दिनचर्या ठरवा. आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यामुळे जसा अग्नी मंद होतो तसेच शरीरात उष्णता वाढते, घाम येतो, रुक्षता येते व शरीरातील पाण्याचे प्रमाणही कमी होते.

निसर्गतःच शरीरातील ताकद कमी होते व शरीर लवकर थकते. यावरून शरीराची काळजी कशी घ्यावी, याचे उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत. भूक असेल तेव्हाच आणि तेवढ्याच प्रमाणात जेवण करावे. जेवणात पातळ भाज्यांच्या पाककृतींचा समावेश असावा. फळभाज्या अधिक असाव्यात. उन्हाळ्यात विविध पेयांना विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये नारळ पाणी, विविध फळांचा रस, कैरीचे पन्हे, सोलकढी, गूळपाणी इत्यादी उत्तम आहेत. आंबा, आवळा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, चिंच, संत्रे, मोसंबी, कलिंगड, खरबूज अशा आंबट गोड फळांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जांभूळ, करवंदासारख्या गावरान मेव्याचा जरूर वापर करावा. शक्‍यतो ताजी फळे खावीत. सोबत मनुके, किसमिस, अंजीर, खजूर या सुक्‍यामेव्याचाही उत्तम फायदा उन्हाळ्यात होतो.

एका वेळी एकच फळाचा आस्वाद घ्यावा. मिक्‍स्ड फ्रूट प्लेट, मिल्कशेक, फ्रूट कस्टर्ड, जॅम्स, जेली व इतर आधुनिक आहारीय पदार्थ यांना आयुर्वेदात स्थान नाही. यांचे बरेच दुष्परिणाम होतात व दीर्घकाळ शरीराला त्रासही देत राहतात. आज काल बाजारात मिळणाऱ्या फळांचे ज्यूस हे प्रक्रिया केलेले असतात. त्यांचा वापर अल्प प्रमाणातच करावा. त्याचप्रमाणे कार्बोनेटेड शीतपेयांमुळे शरीर अजूनच रूक्ष बनते. चांगल्या माठातले नैसर्गिक प्रक्रियेने थंड झालेले पाणी याला उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे. त्यात धने, जिरे घातल्यास उन्हाळ्यात होणारा लघवीचा त्रास कमी होते. वाळा, चंदन कपूर घातल्यास शरीर थंड राहते वा पुदिना, गूळ, लिंबू घातल्यास पचन व्यवस्थित राहते. याचप्रमाणे ऊस, गूळ, खडीसाखर, साखर, बत्तसे यांचाही उपयोग तितकाच महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पाकात केलेले पदार्थ जसे मोरावळा, मोरांबा, आवळा कॅंडी, लिंबाचे गोड लोणचे, सरबत यांचा उपयोग करावा.


उन्हाळा आणि आयुर्वेद