बातम्या

योग्य आहार

proper diet


By nisha patil - 5/2/2024 7:33:22 AM
Share This News:



शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे.आहाराचे प्रमाण, प्रकार, वेळा इत्यादींवर आरोग्य ब-याच अंशी अवलंबून असते. तिखट मसालेदार पदार्थ जेवणात कमी प्रमाणात असावेत. हॉटेलमध्ये खाणे शक्यतो टाळावे. पचायला साधा हलका ताजा आहार, भूक असेल तेव्हाच जेवणे, थोडी भूक ठेवून खाणे हे साधे नियम आहेत.

आयुर्वेदाप्रमाणे आहार
आयुर्वेदाप्रमाणे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सहा चवींचे पदार्थ असतात. या प्रत्येक चवीचा आपल्या खाण्यात समावेश असावा. एकाच चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचाही त्रास होण्याची शक्यता असते. आहार पचण्याची एक चांगली खूण म्हणजे शौचास घाण वास न येणे. तसेच जेवणानंतर सात-आठ तासानंतरही खाल्लेल्या पदार्थाचा वास ढेकरांतून येणे ही अपचनाची खूण आहे.

ऋतुमानाप्रमाणे आहार
ऋतुमानाप्रमाणे आहारात बदल व्हावेत. पावसाळयात, उन्हाळयात भूक मंद असते म्हणून पचायला हलका, कमी आहार घेणे आवश्यक ठरते. याउलट हिवाळयात जड पदार्थही चांगले पचतात. चातुर्मासाची कल्पना यादृष्टीने योग्य आहे. आहारात त्या त्या ऋतूतले पदार्थ (ताजे) घेणे पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

आहाराचा विचार करताना जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ हे कनिष्ठ असतात हे लक्षात ठेवावे. उदा. त-हेत-हेच्या मिठाईपेक्षा साधे ताजे दूध आहारशास्त्राच्या दृष्टीने चांगले असते.

स्निग्ध पदार्थांमध्ये वनस्पती तूप (सर्व प्रकारचे) हे तर अपायकारक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने मात्र गावठी तूप (गाईचे साजूक) आहारात असणे आवश्यक आहे. 'पुफा' गटातली तेले चांगली. ही माहिती हृदयाच्या प्रकरणात दिली आहे.

प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट पदार्थ कमी अधिक सोसतो. या अनुभवावरून प्रत्येकाने आपल्या आहाराचे नियोजन केले पाहिजे. आयुर्वेदातला आहार विचार यासाठी मार्गदर्शक आहे.

आहारासंबंधी आणखी एक नियम म्हणजे उपवास. निदान तिशीनंतर आठवडयातून एक दिवस पूर्णवेळ किंवा एकवेळ उपास करणे आवश्यक आहे. पचनसंस्थेच्या आणि इतर एकंदर आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. जैन धर्मियांकडून उपासांचे शास्त्र शिकण्यासारखे आहे. निरनिराळया खिचडया व पदार्थ खाऊन केलेला उपास म्हणजे केवळ रूचिपालट असतो, उपवास नाही. आहाराबद्दल पुढे स्वतंत्र प्रकरण आहे.


योग्य आहार