बातम्या

विविध पालेभाज्यांचे आहारातील महत्व.

Dietary importance of various leafy vegetables


By nisha patil - 11/6/2024 6:07:39 AM
Share This News:



हिरव्या पालेभाज्यांमध्ये  कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्व असतात. या हिरव्या भाज्यांमधील कॅरोटीनचे अ जीवनसत्व बनते जे डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम असते  असते. परंतु बऱ्याच वेळा लहान मुलांना आणि मोठ्यानं देखील पोट बिघडेल, म्हणून पालेभाज्या खाण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे कोणत्या पालेभाजीमुळे कोणते पोषक जीवनसत्व मिळतात आणि कोणत्या पालेभाजीमुळे अपाय होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत.

पालक
पालक ही  सर्वाना माहित असणारी आणि आरोग्यास उपयुक्त अशी भाजी आहे. या  भाजीत लोह आढळते. तसेच या भाजी मधील घटक हाडे बळकट करण्यास मदत करतात,  या भाजीच्या सेवनाने पोटात येणार मुरडा थांबतो, आणि  वारंवार जुलाब होत असल्यास ते  थांबतात.

मेथी
सगळ्या स्वरूपातील मेथी म्हणजे मेथीचे दाणे, मेथीची भाजी ही मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक सुधारते, अन्नाचे पचन सुधारते.

माठ
साधारणता दोन प्रकारची माठाची भाजी असते. एक लाल माठ आणि हिरवा माठ. या भाजीचा आहारातील समावेश वजन वाढवायला मदत करतो तसेच आम्लपित्त  असणाऱ्यांना या भाजीच्या सेवनाने विशेष फायदा होतो. मूतखडय़ाची तक्रार असणाऱ्यांनी या भाजीचे सेवन करणे टाळावे. दुसऱ्या प्रकारचा माठ म्हणजे तांबडा माठ आहे हा रक्तवर्धक असतो.

मुळा
कच्चा कोवळा मुळा हा मलमूत्राच्या विकारांवर उपयुक्त ठरतो तसेच थोडा जून झालेल्या कच्च्या मुळ्याचे सेवन  मूळव्याध, पोटात गुबारा  धरणे, गॅसेस होणे, अपचन अश्या पोटाच्या तक्रारीमध्ये उपयुक्त ठरते.

अळू
अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. बाळंतिणीस दूध कमी येत असल्यास अळूची भाजी भरपूर खावी. भाजीकरिता पाने व देठ दोन्हींचा उपयोग करावा.

अंबाडी
ही भाजी मस्त आंबट आणि रुचकर अशी लागते, पण त्वचारोग असणाऱ्यांनी इ आंबट भाजी खाऊ नये. तसेच रक्ताचे विकार असणाऱ्यांनी ही भाजी खाऊ नये. याने रक्तदोष वाढतो. तसेच ही भाजी उष्ण असते त्यामुळे उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी  देखील या भाजीचे सेवन करू नये.

* घोळ/घोळू*
ही भाजी बुळबुळीत आणि चवीला  थोडी वेगळी लागते. परंतु ही थंड असते. तसेच घोळची भाजी अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते.

चाकवत
ताप किंवा आजारपणामुळे  तोंडाची चव गेली असल्यास भाजीच्या सेवनाने तोंडाला चव येते, छातीत जळजळ होत असल्यास साध्या पद्धतीने पातळ भाजी तयार करून त्याचे सेवन करावे. ही भाजी आवडीनुसार लसूण,आले आणि जर भाजी मुळात आंबट नसेल तर ताक घालून देखील करतात.

तांदुळजा
नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीकरिता, जसे  वयोवृद्ध व्यक्ती, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी तांदुळजा ही भाजी खूप उपयुक्त ठरते. या भाजीचे सेवन डोळ्यांचे विकार, खाज सुटणे, मलविरोध अश्या प्रकारच्या विकारामध्ये उपयुक्त ठरते. बहुतांशी शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक या भाजीच्या सेवनाने मिळतात.

करडई
तुलनेने या भाजीत उष्मांक कमी असल्याने या पालेभाजीच्या सेवनाने वजन नियंत्रणा राहण्यास मदत होते . लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी फार उपयुक्त आहे. मात्र डोळय़ाच्या व त्वचेच्या समस्या असणाऱ्यांनी या भाजीचे सेवन न केलेलेच  बरे.

* शेपू*
शेपूच्या भाजीच्या उग्र वासामुळे ती बऱ्याच जणांना आवडत नाही. उग्र वास असला तरी ही भाजी आरोग्यास उपयुक्त अशी भाजी आहे, या भाजीच्या सेवनाने गॅससेचे प्रमाण कमी होते. तसेच या भाजीच्या सेवनाने लहान मुलांची पोटदुखी, जंत कृमी या तक्रारी कमी होतात. अनियमित मासिक पाळी साठी देखील या भाजीचे सेवन उपयुक्त ठरते.

कोणत्याही पदार्थ आरोग्यास कितीही चांगला असला तरी त्याचे अति सेवन हे आरोग्यास घातकच असते. त्यामुळे पालेभाज्या खाताना त्या योग्य प्रमाणात खाव्यात. आणि या भाज्या स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करावा. तसेच लहान बाळांसाठी भाज्या शिजवून कुस्करून अगदी मऊसर पातळ करून घ्याव्यात. शिजलेल्या भाज्यांचे पाणी टाकून देऊ नये.


विविध पालेभाज्यांचे आहारातील महत्व.