बातम्या

स्मार्टफोन ठरतोय वेदनेचं कारण; हातावर होतोय वाईट परिणाम, अतिवापर ठरू शकतो घातक.....

Smartphone is becoming the cause of pain


By nisha patil - 4/7/2024 7:12:33 AM
Share This News:



स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिसचं काम असो किंवा सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ पाहणे असो, हे सर्व आपण स्मार्टफोनवरच करतो. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत. तसे काही दुष्परिणाम देखील आहे. यामुळे आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम होत असतात, ज्याकडे आपण कमी लक्ष देतो.

स्मार्टफोनमुळे आपल्या डोळ्यांवर होणाऱ्या परिणामाची सर्वात जास्त चर्चा होते. आपलं लक्ष नेहमी स्क्रीन टाइमवर असतं, परंतु त्याचा आपल्या हातांवर काय परिणाम होतो हे कधीच लक्षात घेतलं जात नाही. त्याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोनच्या वापराचा सर्वात मोठा परिणाम आपल्या हाताच्या बोटांवर दिसून येतो. हाताची बोटं आणि अंगठ्यावर याचा गंभीर परिणाम होतो. हे केवळ स्मार्टफोनवरच नाही तर टॅब्लेट आणि व्हिडीओ गेम कंट्रोलरमुळे देखील होतं.

जर तुम्ही जास्त टाईप केले तर तुमचा अंगठा आणि बोटं दुखू लागतात. त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडीओ गेम कंट्रोलर जास्त वेळ वापरल्यास तुमचे हात दुखू लागतात. फोन बराच वेळ हातात ठेवल्यानेही असेच काहीसे घडते. अनेकवेळा तुमच्या लक्षात आलं असेल की फोनमुळे तुमच्या बोटावर एक खूण तयार होते.

तुम्ही फोन कसा धरता याचाही तुमच्या मनगटावर परिणाम होतो. तुम्ही तुमचा फोन बराच वेळ धरून ठेवल्यास, हातामध्ये वेदना सुरू होतात. या अवस्थेला 'स्मार्टफोन फिंगर' असं म्हटलं जात आहे.

हातावर वाईट परिणाम होण्याचं प्रमुख कारण म्हणजे स्मार्टफोनचे सतत वाढत जाणारे वजन आणि आकार. एक काळ असा होता की लोकांच्या हातात छोटे फोन असायचे, ज्याचं वजन कमी होतं. मग कालांतराने फोनचा आकार आणि वजन वाढतच गेलं त्यामुळे तुमच्या हातांचं नुकसान होत आहे.

स्मार्टफोन बराच वेळ वापरल्यानंतर जर तुमचा हात दुखू लागला तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात...
- स्मार्टफोन ताबडतोब खाली ठेवा म्हणजेच तो वापरणे बंद करा.
- हळूहळू तुमच्या स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.
- जिथे तुम्हाला जास्त त्रास होत असेल तिथे तुम्ही बर्फाने शेक देऊ शकता.
- याशिवाय तुम्ही हीट थेरपी देखील वापरू शकता.
- तुमच्या वेदना वाढत राहिल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.


स्मार्टफोन ठरतोय वेदनेचं कारण; हातावर होतोय वाईट परिणाम, अतिवापर ठरू शकतो घातक.....